इयत्ता ९ वी मराठी कवितेचे रसग्रहण _ द्वितीय सत्र

इयत्ता ९ वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार प्रश्न २ (ब) हा कवितेच्या रसग्रहणावर आधारित असतो. कृतिपत्रिकेत हा ०४ गुणांचा प्रश्नप्रकार असून, त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

पठित पद्यांपैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कवितांपैकी कोणत्याही दोन कवितांची नावे देऊन, त्यांपैकी एका कवितेवर पुढील कृतींना अनुसरून रसग्रहणात्मक प्रश्न विचारला जाईल

(१) कवी / कवयित्री, संदर्भ (२)प्रस्तुत कवितेचा विषय (३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ (४) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये (५) कवितेतून व्यक्त होणारा विचार (६) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ (७) कवितेतून मिळणारा संदेश (८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे

  कवितेचे रसग्रहण म्हणजे काय, यातील कृतींचा अभ्यास करण्यासाठी नेमके काय करावे, याबाबत पुढे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

रसग्रहण म्हणजे काय ?

कवितेचा सर्व बाजूंनी, पूर्णांगाने आस्वाद घेणे म्हणजे कवितेचे रसग्रहण करणे होय. कवितेचा छंद, प्रकार, भाषिक वैशिष्ट्ये, शब्दकळा आशयाची मांडणी, सहजता, आवाहकता या घटकांची विस्ताराने मांडणी करणे रसग्रहणात आवश्यक असते. कवितेतील प्रतीके व प्रतिमा उलगडून दाखवणे, त्यातील भावसौंदर्य, अर्थसौंदर्य समजावून सांगणे हे रसग्रहणात महत्त्वाचे असते. कवितेतून मिळणारी शिकवण, संदेश किंवा मौलिक विचार नेमकेपणाने सांगणेही आवश्यक असते. कवितेतून होणारी रसांची निष्पत्ती व त्याचे ग्रहण (आस्वाद) करणे, म्हणजेच कवितेचे सर्वांगाने रसग्रहण होय.

वरील ८ कृतींपैकी कृतिपत्रिकेत १-१ गुणाच्या पहिल्या २ कृती आणि २ गुणांची कोणतीही १ कृती विचारली जाईल.

उत्तराच्या सुरुवातीला तुम्ही निवडलेल्या कवितेचे नाव लिहिणे आवश्यक आहे.

ही कृती सोडवण्यासाठी अभ्यास असा करा :

·       कवींचे /कवयित्रींचे नाव, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्ये, व्यक्त होणारा विचार, आवड किंवा नावडीची कारणे इत्यादीसाठी पुढील उत्तर नीट अभ्यासावे.

·       कवितेतील दिलेल्या ओळींच्या सरळ अर्थासाठी कवितेचा भावार्थ नीट अभ्यासावा.

·       कवितेतील शब्दांच्या अर्थासाठी कवितेच्या सुरुवातीला दिलेले शब्दार्थ अभ्यासावेत.


  कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  :  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे.

(२) कवितेचा विषय   :   या महाराष्ट्र गौरवगीतात शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, इथले नरवीर, मराठी मनाचा स्वभाव यांची ओजस्वी शब्दांत ओळख करून दिली आहे.

(३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →
       (१) काया = शरीर
       (२) धरा = धरणी
        (३) अंबर = आकाश
       (४) साचे = खरे
       (५) मनीषा = इच्छा
      (६) आण = शपथ.

(४) कवितेतून मिळणारा संदेश :  → शिवरायांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या महाराष्ट्रभूमीला वंदन करणे व तिचे पांग फेडणे, हे आपले कर्तव्य आहे, असा संदेश या कवितेत दिला आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून मराठी मनाची एकजूट कायम ठेवावी, ही शिकवण दिली आहे.

(५) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये : हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकळेत साकार केले आहे. बाहू स्फुरण पावतील, अशी आवाहनात्मक भाषेची वीण आहे. योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे. 'या सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया' अशा सुभाषितप्रचुर भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीरश्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचे दर्शन होते. 'महाराष्ट्रास्तव लढण्याचे' आवाहन काळजाला भिडते.

(६) कवितेतून व्यक्त होणारा विचार :कर्तृत्ववान इतिहासाची आठवण ठेवून एकजुटीने महाराष्ट्रभूमीचे पांग फेडण्यासाठी जीव कुर्बान • करावा, हा विचार मांडला आहे.

७) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :

महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती ।। सुवर्णधरा खालती। निल अंबर भरले वरती ।।

  महाराष्ट्रभूमीचा गौरव करताना शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणतात की, महाराष्ट्र हे पवित्र मंदिर आहे. या मंदिरापुढे वीरपुरुषांनी बलिदान केलेल्या प्राणांची ज्योत जळत आहे. महाराष्ट्र ही सोन्याची अशी धरती आहे की, त्या धरतीवर निळ्या आकाशाचे छत आहे.

(८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे →

महाराष्ट्राचा बलशाली इतिहास, पवित्र भूमी, श्रीशिवरायांची धुरंधर राजनीती, कर्तव्याची जाण, भविष्याची ग्वाही अशी टप्प्याटप्प्याने उलगडणारी ही कविता आस्वादताना अंगात वीरश्री संचारते. तसेच उपकाराला स्मरून जीव ओवाळून टाकावा, अशी महाराष्ट्रभूमीचे नितांत सुंदर वर्णन असलेली व तेजस्वी शब्दांत आवाहक भावना रुजवणारी ही कविता मला आवडली.

 कविता - निरोप.

 (१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री →  मराठीतील प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोळे यांची ही कविता आहे.

(२) कवितेचा विषय   रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीरमाउलीच्या मनातल्या विविध भावनांचे चित्रण करणे, हा या कवितेचा विषय आहे.

(३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →
      (१) घर = सदन
      (२) औक्षण = ओवाळणी
      (३) बाहू = हात
      (४) डोळा = नेत्र
      (५) मुख = तोंड
      (६) सावली = छाया
       (७) शक्ती = बळ
      (८) हात = हस्त.

(४) कवितेतून मिळणारा संदेश :  वीरमातेच्या मनोगतातून कवयित्रींनी मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे. तसेच मातेचे मृद् हृदय प्रसंगी किती कणखर असते, याची ग्वाही देणारी ही कविता आहे.

(५) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये : → प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे.  भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.

(६) कवितेतून व्यक्त होणारा विचार :   देशरक्षणासाठी मुलाला रणात पाठवणाऱ्या वीरमातेचे दृढ निश्चयी व तितकेच प्रेमळ मन या कवितेत प्रकर्षाने दृष्टीस पडते.

(७) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :
       धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन !

→ रणात चाललेल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते-तू माझ्यापोटी जन्मलास ती माझी कूस तू कृतार्थ कर. तू विजयी होऊन आलास की माझ्या हातांनी अगदी मायेने मी तुला दूधभात भरवीन.

(८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे →

रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या आईचे गलबललेले मन व तेवढीच तिच्या मनाची कणखरता याचे मनोज्ञ दर्शन या कवितेत कवयित्रींनी केले आहे. तसेच श्रीशिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यास सांगून आपणही महाराष्ट्रकन्येचा वारसा चालवत आहोत, असे ठामपणे सांगणाऱ्या आईच्या मनःस्थितीचे यथार्थ चित्रण या कवितेत केले असल्यामुळे, मनात आर्तता व वीरता जागवणारी ही कविता मला अत्यंत आवडली.

 कविता - वनवासी.

 (१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री :   तुकाराम धांडे.

(२) कवितेचा विषय :  कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण आदिवासी बोलीत करणे, हा कवितेचा विषय आहे.

(३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ :
       (१) डोंगर = पर्वत
       (२) खडक = दगड
       (३) आभाळ = आकाश
       (४) पृथ्वी = अवनी
       (५) वाघ = व्याघ्र
       (६) सूर्य = रवी
       (७) चंद्र = शशी
       (८) बोली = भाषा.

(४) कवितेतून मिळणारा संदेश :  जगणाऱ्या मानवांच्या जीवनशैलीचा आपल्या सभोवती निसर्गात परिचय व्हावा आणि त्यांच्या जगण्याशी आपण समरस होऊन सह-अनुभूती घ्यावी, हे उद्दिष्ट या कवितेचे आहे.

(५) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :→  सैल अष्टाक्षरी छंदात ही कविता आहे. ग्रामीण बोलीभाषेतील जिवंत चैतन्य या कवितेच्या शब्दकळेत भारलेले दिसते. कळसूआई व प्रवरामाई यांची ही बाळे, हातात भाकरी-भाजी घेऊन खडकावर बसून खाणारी ही मुले, वाऱ्याच्या संगतीत खेळणारी व आभाळ पांघरणारी, सूर्याचंद्राशी बोलणारी आणि पक्ष्यांची बोली कंठात असणारी व चांदण्या हातात आणण्याची जिद्द असणारी ही पोरे या सर्व नवीन व ताज्या प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. सहज जीवनशैलीची सहज भाषा उत्कटपणे कींनी कवितेत मांडली आहे. वाघाचे लवण, वांदार नळी, उंबरमाळी, तिंकिड्या हे नक्षत्र असल्या अपरिचित पण जिवंत संकल्पना नव्याने कवितेत आल्या आहेत.

(६) कवितेतून व्यक्त होणारा विचार :→ वनामध्ये राहणारी आदिवासी मुले व त्यांची उत्साही वृत्ती यांचे दर्शन या कवितेतून घडते.

(७) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ 
    आम्ही सस्याच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून हात लाऊन गंगना येऊ चांदण्या घेऊन.

→ आम्ही सशाच्या गतीने डोंगर चढून जातो. आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो. निसर्गात राहताना आम्हांला अनोखा आनंद होतो.

(८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे →

आदिवासी लेकरांचे अनोखे भावविश्व या कवितेत मांडले आहे. डोंगरदऱ्यांत, उघड्या निसर्गात मुक्तपणे, निर्भयपणे निसर्गाचेच घटक होऊन राहणारी ही वनवासी मुले कशी जगतात, याचे प्रत्ययकारी चित्रण करणारी ही कविता आहे. संवेदनशील मनाला भावेल, असे वेगळे जीवनदर्शन व वेगळी जीवनदृष्टी देणारी ही कविता असल्यामुळे ग्रामीण बोलीतील ही सहजसुंदर कविता मला आवडली. 

 कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !


(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  :→ संदीप खरे.

(२) कवितेचा विषय :→ तरुण पिढीने कसे वर्तन ठेवावे व कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात यांचे मार्गदर्शन या कवितेत केले आहे.

(३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ→
     (१) दिवा = दीप
     (२) कार्य = काम
     (३) झोप = निद्रा
     (४) पावित्र्य = मांगल्य
     (५) नयन = डोळे 
     (६) अश्रू = आसू
     (७) करुणा = दया
     (८) पथ = मार्ग
     (९) काटा = कंटक
     (१०) हिंमत = धैर्य.

(४)कवितेतून मिळणारा संदेश :
 आपले जगणे सत्यम्, शिवम्, सुंदरम् करावे. लेखन-वाचनाने ज्ञान वाढवावे. माणुसकी जपावी. कुणाला कुत्सित बोलू नये, मत्सर करू नये. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते.

(५) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत 'फटका' हा

पूर्वापार चालत आलेला छंदप्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये, याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते उपदेशात्मक गाभा असतो, जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमकप्रधान कविता असूनही एक संथ, लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे.

(६) कवितेतून व्यक्त होणारा विचार  :→ जीवनात कसे वागावे व कसे वागू नये, याचा परिपाठ दिला आहे. 

(७) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ : 
तुडवित राने खुशाल जावे, नव्या पथाला भिउ नको ज्यावर श्रद्धा प्राणाआतुन ते केल्याविण राहु नको !

→ माणसाने कसे वागावे हे सांगताना कवी म्हणतात- नवनवीन ज्ञानाची राने आनंदाने तुडवीत जावीत. नवीन मार्गाने चालण्यास म्हणजे नवीन विचार अंगिकारण्यास भीती बाळगू नये. ज्या तत्त्वांवर निष्ठा असेल, ती कार्ये केल्याशिवाय राहू नये.

(८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :→ 
या कवितेत तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन केले आहे. आपले जगणे कसे मूल्यवान व अर्थपूर्ण व्हावे, याचा नेमक्या शब्दांत व थेट उपदेश केला आहे. लाचारीचे जिणे नको; तर स्वाभिमानाने जगणे कसे असावे, याचा पाठ या कवितेत दिला आहे. आधुनिक वैफल्यग्रस्ततेत आशादायी व आदर्श जीवनाचे चित्रण या कवितेत केले असल्यामुळे ही कविता मला भावली.

Previous Post Next Post